
दि.10 : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra singh Dhoni) हा जगातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. धोनी कर्णधार कसा झाला? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी रांचीमध्ये बोलताना एक वक्तव्य केलं. शरद पवार (Sharad Pawar) हे 2005 ते 2008 दरम्यान BCCI चे अध्यक्ष होते.
झारखंडच्या दौऱ्यावर आलेले शरद पवार म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा यांच्या धरतीवर जन्मलेल्या महेंद्र सिंह धोनीने संपूर्ण झारखंडचं नाव रोशन केलं आहे. एक घटनेचा उल्लेख करताना त्यांनी म्हटलं की, टीम इंडियाचा कर्णधार असताना राहुल द्रविडने मला विचारले की, कर्णधारपदावर असल्याने त्याच्या फलंदाजीवर परिणाम होत आहे. त्यामुळे त्याला राजीनामा द्यायचा आहे.
सचिन तेंडुलकरने सूचवला होता पर्याय
शरद पवारांनी म्हटलं की, राहुल द्रविडने राजीनामा देण्याबाबत विचारणा केली असता मी सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) कर्णधारपद घेण्यासाठी सुचवलं होतं. पण सचिनने ही जबाबदारी सांभाळण्यास नकार दिला. तर मी सचिनला विचारलं की, तर मग ही जबाबदारी कोणाला देऊ. त्यावर तेंडुलकरने धोनीच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्याचा सल्ला दिला. तो देशाचं नाव उंचावर नेईल. आणि नंतर तसंच झालं.
महेंद्रसिंह धोनीने 2014 मध्ये टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर धोनीची जबाबदारी विराटच्या खांद्यावर आली. धोनीने 2004 मध्ये बांगलादेश विरुद्ध वनडेमध्ये पदार्पण केले. येथून धोनीने नंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. एक उत्तर फिनीशर म्हणून त्याची ओळख झाली. त्यानंतर त्याचा प्रवास सर्वात यशस्वी कर्णधारपर्यंत येऊन पोहोचला.
धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2007 साली पहिलाा टी-20 वर्ल्डकप जिंकत इतिहास रचला. धोनाच्या नावावर 17 हजार धावा आहेत. तसेच टी-20, वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन्ही स्पर्धा जिंकणारा महेंद्रसिंह धोनी हा पहिला कर्णधार आहे.